थंडीने दोघांचा मृत्यू तर मुंबई, पुण्यातही थंडी वाढणार
अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची शंका व्यक्त केले जात आहे.
शहरातील मोरभवन जवळ 70 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळले आहेत तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सर्व राज्यांत दाट धुके तसेच थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हरियाणा भागांत तीव्र थंडी आणि दाट धुके पसरले आहे.
भारतातून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात येत्या २४ तासांत थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ आहे. मात्र, उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्याचे तापमान 11.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.