Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होताच उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात, म्हणाले; "महाराष्ट्र लुबाडायला..."

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. परंतु, महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Uddhav Thackeray On Maharashtra Assembly Budget : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. परंतु, महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले,महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेला आहे. काहीतरी खोटं बोलून जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची. निवडणूक आल्यानंतर अशा काही गोष्टी केल्या जातात. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. यात थापांचा महापूर आहे. सर्व घटकांना जोडून नेण्याचा हा एक खोटा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत 'खोटं नरेटिव्ह' असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल. आर्थिक तरतूद कशी करणार, याचा उल्लेख या अर्थसंकल्पात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आमच्या महाविकास आघाडीची मागणी आहे की, गेल्या दोन वर्षात त्यांनी ज्या काही घोषणा केल्या, त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या? या बद्दल तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत, ज्या घोषित झाल्या, परंतू प्रत्यक्षात आलेल्या नाहीयत. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे, महिलांना मतदानाच्या दृष्टीकोनातू आपल्या बाजूला करुन घेतल्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय.

महिलासांठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असाल, तर जरुर आणा. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल, तर मुलांसाठीही आणा. पण राज्यात हजारो तरुण बेरोजगार असताना घरी गेल्यावर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. शेतकऱ्यांना वीजबील माफ करा, अशी मागणी मी केली होती. ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ही मागणी त्यांनी मान्य केली नाही. आजपर्यंतची थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाकरे पुढे म्हणाले, एक लाखांचं खत विकत घेतलं, तर १८ हजार रुपये सरकारकडे जमा होतात. १८ हजार कोटीतून ६ हजार कोटी तुम्ही देणार, म्हणजे आमचे १२ हजार कोटी रुपये तुमच्याकडे बाकी आहेत. शेतकऱ्याला एका बाजूला लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनं उदारपणाचा आव आणत आहेत. जर या सरकारला खोट्या मलमपट्ट्या लावून दाखवायचं असेल, तर हे चिडलेले लोक अजिबात शांत होणार नाही. विधानसभेच्या निवडणुका कधी होतात? याची वाट शेतकरी आणि महाराष्ट्राची जनता पाहत आहे.

अच्छे दिन आयेंगे, १५ लाख रुपये येतील, असं आता कुणी बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यावर हे सांगतील, हे तर जुमले होते. अर्थसंकल्प हा एक जुमला संकल्प आहे. या जुमल्याबाजीला लोकं भीख घालणार नाहीत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा जनता निवडून देईल, असं मला वाटत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com