लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगे पाटील यांना रोखठोक उत्तर, म्हणाले; "सर्वात आधी आरक्षण पॉलिसी..."
Manoj Hake Press Conference : जरांगे पाटील म्हणतात की, या नेत्यांनी एसटीची लढाई लढली असती, तर या नेत्यांना एसटी मिळाली असती. एसटीची लढाई हा वेगळा भाग आहे. पण आमच्या ताटात जे साडेतीन टक्के आरक्षण आहे, आत्ता आमची मुलं कुठंतरी शिक्षक होत आहेत. कुठेतरी नोकऱ्यांमध्ये जायला लागले आहेत. त्या लोकांचे रात्रंदिवस कॉल येत आहेत. जी मुंल आता अॅडमिशन घेत आहेत, त्यांना प्रमाणपत्राची गरज आहे आणि ते आम्हाला गाजर दाखवत आहेत. आमच्यात दरार निर्माण करायची, भुजबळांच्या सांगण्यावरून हा काम करतोय, धनगर समाजाचा आणि माझा विरोध नाही, असं काहीतरी अतार्किक बोलून आमच्या लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जरांगेंनी करु नये. त्यांनी सर्वात आधी आरक्षण पॉलिसी समजून घ्यावी, अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.
मुस्लिम समाजाच्याही सरकारी नोंदी आहेत, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे, यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके म्हणाले, हिंदू समाज हा सामाजिक उतरंडी मध्ये विभागला गेला आहे. मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं. त्यांच्यात जाती नाहीत. त्यांच्यात धर्म आहे. त्यांच्याकडे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाही. शब्बीर अन्सारी यांनी चळवळीच्या माध्यमातून जवळपास शंभर जीआर मुस्लिमांच्या बाबतीत करुन घेतले आहेत.
न्यायव्यवस्थेत समतेचं तत्व आहे. घटनेत समतेचं तत्व आहे. एखादी आरक्षण पॉलिसी ठरवताना समाज व्यवहारातील जात, कागदोपत्री असणारी जात आणि ऐतिहासिक संदर्भात असलेली जात या सर्व गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुणाला सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही. मराठा समाजाने अनेकदा या महाराष्ट्रात आयोगांसमोर वारंवार मागण्या केल्या. घटनात्मक अधिकार असलेला जो आयोग आहे, संविधानाच्या तरतुदीमध्ये मराठा समाज हा समाजिक मागासलेपण सिद्ध करु शकला नाही.
राणे कमिटीच्या माध्यमातून त्यांनी असं करायचा प्रयत्न केला, तो सुप्रीम कोर्टाने रद्द केला. यावर कुणीही बोलायला तयार नाही. एखाद्यानं मोर्चा काढला, आंदोलन केलं आणि एखाद्यानं झुंडशाहीच्या जोरावर इथली व्यवस्था वेठीस धरावी आणि आरक्षण मागावं, आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला बघतोच, २८८ निवडणुका लढतोच, छगन भुजबळांना संपवतोच, धनगर बांधवांसोबत माझा विरोध नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.