Manoj Jarange Patil: "गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात..."; बीडमध्ये मनोज जरांगे पाटील कडाडले
Manoj Jarane Patil Speech : मराठा आणि कुणबी एकच आहेत. हा कायदा लागू करण्यासाठी आम्ही दहा महिन्यांपासून मागणी करत आहोत. ज्यावेळी आमची सरकारची बोलणी सुरु झाली, त्यावेळी चार विषयावर चर्चा सुरु झाली होती. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. सगेसोयऱ्यांवर चर्चा झाली. मला माहित होतं, गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं. जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. त्याला वाटतंय तोच खूप हुशार आहे. पण त्याच्या पुढचा आहे, असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. ते बीडमध्ये मराठा समाजाच्या शांतता रॅलीत बोलत होते.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, आता ते म्हणतात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी टीकणार नाही. छगन भुजबळांनी आंतरवाली सराटीत आमच्याविरोधात आंदोलन केलं. तिथे इतके ओबीसीचे नेते घेऊन कशाला आला होता? मला माहित होतं, सग्यासोयऱ्याच्या अंमलबजावणीत तो अडचण आणणार. मराठ्यांनी अजिबात गाफील राहायचं नाही. सगेसोयऱ्यांच्या शब्दावर सर्व शिष्टमंडळाने एक मत केलं की, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडतील आणि ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत. त्या नोंदीच्या आधारावरच या मराठ्याच्या सोयऱ्याला आरक्षण द्यायचं, यावर एकमत झालं.
पण मला माहित होतं, गिरीश महाजन कायतरी खोडी करणार. तो म्हणाला, सगेसोयरे टीकणार नाहीत. गिरीश महाजन साहेब मी तुमच्या पुढचा आहे. मराठ्यांना त्रास देणार मराठा असला, तरी त्याला निवडून द्यायचं नाही. मी जातीवाद केला नाही. मला माझ्या जातीचा गर्व आहे. मला फसवलं तर मी पुन्हा लढेल, असं म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.