MNS ने झेंड्यावरुन राजमुद्रा काढावी अन्यथा रस्त्यावर उतरु; मराठा मोर्चाचा इशारा
मनसेच्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. त्यातच आता या सभेवरून आरोप प्रत्योरोप सुरु आहेत. राजकीय पक्षांकडून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) देखील या वादात उडी घेतली आहे. मनसेच्या (MNS) झेंड्यातील राजमुद्रा तात्काळ हटवावी अशी मागणी मराठा मोर्चाकडून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची अस्मिता असणारी राजमुद्रा ही स्वराज्यातील नेमून दिलेल्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कुणालाही वापरता येत नव्हती. त्याचप्रमाणे आज ही राजमुद्रा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त कुणालाही वापरता येत नाही. छत्रपतींच्या स्वराज्यातील राजमुद्रेचा वापर मनसेच्या झेंड्यामध्ये केलेला आहे, हे झेंडे रस्त्यावर आणि इतर कुठेही पडलेले असतात. यामुळे छत्रपतींचा अवमान या ठिकाणी होत असताना दिसत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी झेंड्यावर स्वतःचा फोटो टाकावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, मनसेने पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन टाकावं, त्याला कोणताही विरोध असणार नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान कदापी सहन करणार नाही. सर्व मराठा संघटना, सर्व शिवप्रेमी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका अशी विनंती वजा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.