मेळघाटात दुषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू, 30 जण रुग्णालयात; नेते मंडळीत चिखलफेकीत व्यस्त
सुरज दाहाट | मेळघाट : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात (Melghat, Amravati)अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. चिखलदरा तालुक्यातील (Chikhaldara) पाचडोंगरी व कोयलारी या गावात दूषित पाण्यामुळे डायरीयाची लागण झालेली आहे. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यासोबतच तब्बल तीस ते चाळीस नागरिकांना उपचारासाठी काटकुंभ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती काटकुंभ आरोग्य केंद्राचे डॉक्टर अंकित राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढली असून, स्थानिक प्रशासनाच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (Melghat : Two die due to contaminated water in 30 hospitalized)
पाच डोंगरी या गावचा विजेचा पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शेजारच्या विहिरीतून किंवा ओढ्यातून अशुद्ध पाणी आणावं लागते. पिण्याच्या पाण्यासाठी एकीकडे ही फरपट सुरु असताना दुसरीकडे आता अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्यानं नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामारं जावं लागतंय. हे अशुद्ध पाणी पिल्यामुळे कालपासून नागरिकांना डायरियाची लागण झालेली आहे अशी माहिती सरपंच संजय मावस्कर यांनी दिली.
दरम्यान, विज पुरवठा खंडीत असल्यानं निर्माण झालेल्या समस्येवर प्रशासन आणखी किती जीव गेल्यावर तोडगा काढणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.