Lokshahi Marathwada Sanwad 2025 | Atul Save | "जातनिहाय जनगणनेमुळे तळागाळातील समाजाला ओळख मिळेल"; मंत्री अतुल सावे यांचा विश्वास
'लोकशाही मराठी' चॅनलतर्फे छत्रपती संभाजी नगरमध्ये 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील अनेक दिग्गजांचा सत्कारदेखील केला गेला. मराठवाड्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी राजकीय नेत्यांचे व्हिजन काय आहे? तसेच मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा असावा? याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, ओबीसी विकास, दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात देशामध्ये येणारे सोलार क्रांतीचे व्हिजन मांडले.
यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, "मराठवाड्यात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मापासून असल्यामुळे या शहरासाठी काहीतरी करावं ही भावना ठेऊन मी काम करत आलो आहे. मी राजकारणात काम करत असताना या शहरात केलेल्या गोष्टी म्हणजे 2019 पहिल्यांदा उद्योग राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, या शहराचा विकास करायचा असेल तर येतील पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. मला सांगायला आनंद होतोय की, 55 दिवस मी कुठलाही सत्कार घेतला नाही. ज्या दिवशी 16,080 कोटींची पाण्यासाठीची योजना मंजूर झाली. त्याचं टेंडर होऊन मंजूरही झालं. परंतू आमचं सरकार आलं नाही. त्यांनतर योजनेचं श्रेय कोणाला द्यायचं यावर वाद झाला. मात्र आता त्या योजनेवर काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जे पाणी 7-8 दिवसांतून मिळायंच तेच 3-4 दिवसांनी मिळू शकेल. ही योजना 6-7 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच या शहराला मुलबक पाणी मिळेल.'
"या शहरात उद्योग यायला हवे, त्याने शहराचा आणखी विकास होईल. आज जवळपास 2 हजार कोटींची गुंतवणूक विविध माध्यमातून आमच्या सरकारने या शहरात केली आहे. भविष्यात संभाजीनगरची ओळख ही ऑटोमोबाईल हब आणि ईव्ही हब अशी करायची आहे. केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय पुढील काळात नक्कीच छोट्या - छोट्या समाजाला ओळख नव्हती, त्यांना ओळख मिळेल. त्यांना योजनांचा लाभ मिळेल. त्यांचे हक्काचे विषय समोर येतील. दूध व्यवसाय दिवसेंदिवस कठिण होत आहे. सरकार देऊन देऊन किती अनुदान देणार. म्हणून त्यांना समांतर दुसरे काही उद्योग द्यायला हवेत. शिवाय मुंबईतील बंद पडलेलं आरे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा ब्रँड आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात आरे दुध डेअरी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे," असे त्यांनी नमूद केले.
मंत्री सावे यांनी सांगितले की, "माझ्याकडे सोलार एनर्जी विभाग आहे. आमचा प्रयत्न असा आहे की, कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना साडेसात एचपीचा पंप त्यावर सोलार लावू जेणेकरून त्याला दिवसापण शेतासाठी पाणी मिळेल. यासाठी अडीच लाख पंप गेल्या २ वर्षात उपलब्ध केले आहेत. अजून 5 लाख पंप देण्याचा आमचा संकल्प आहे. 2030 पर्यंत आपला देश सोलारवर चालणारा असेल, असा प्रयत्न आहे."