मंत्र्यांना बंगले दिले, खात्याचं काय? शिंदे सरकारवर आदित्य ठाकरेंची घणाघाती
कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष दिसून येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणेश उत्सव पहाण्यासाठी ते शहरात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे , फडणवीस सरकारवर चांगलाच टोला लगावला आहे. राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अद्यापही खाते वाटप होत नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्तचं असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होतं, मात्र अद्यापही खाते वाटप झालं नाही. जिल्हे पालकमंत्र्यांविनाचअसल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना काळात जशी परिस्थिती होती तसे निर्णय घेण्यात आले. राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आपण अनेकांचे जीव वाचू शकलो, नाहीतर महाराष्ट्रात देखील इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असती. कोणत्याही धर्मात लोकांचा जीव वाचवण्याची शिकवण मिळते असे आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले.
शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून अनेकदा आता सणोत्सव हे निर्बंधमुक्त वातावरणात पार पडत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून देखील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.