Lokshahi Marathwada Sanwad 2025|Babanrao Lonikar|"काँग्रेसच्या काळात मराठवाड्यावर अन्याय झाला"; बबनराव लोणीकरांनी व्यक्त केली खंत
'लोकशाही मराठी' चॅनलतर्फे छत्रपती संभाजी नगरमध्ये 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील अनेक दिग्गजांचा सत्कारदेखील केला गेला. मराठवाड्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी राजकीय नेत्यांचे व्हिजन काय आहे? तसेच मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा असावा? याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रामुख्याने मराठवाड्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न यावेळी मांडला.
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर बोलताना लोणीकर म्हणाले की, "गेली 50 वर्ष सातत्यानं मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे, हे खरं आहे. याची चर्चा नेहमी होते. 50 वर्षाच्या राजवटीमध्ये मराठवाड्यातील जे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याचा, विजेचा प्रश्न असेल, शेतात जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न असेल. जिल्हा मार्ग, तालुका मार्ग, गावाला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न असेल, नॅशनल हायवे, सिमेंट रोड, मराठवाड्यातील शिक्षण, आरोग्यविषय सेवा या सगळ्याच सुविधांबाबत गेली 50 वर्ष मराठवाड्यावर अन्याय झाला, ही खंत मराठवाड्याच्या मनामध्ये होती. केंद्रामध्ये मोदी सरकार आलं, गेल्या 10 वर्षातील फरक मी मांडतो. महायुतीच्या काळातील कामं ही जनतेच्या समोर आहेत. याला चालना देण्याच काम लोकशाही न्यूजनं केलं आहे. मराठवाड्यात सातत्यानं जो दुष्काळ पडतो. मराठवाडा हा प्रामुख्यानं शेती व्यवसायावर अवलंबून आहे. छत्रपती संभाजीनगर सोडलं तर इतर ग्रामीण भागात फार काही उद्योगाचे स्त्रोत नाहीत. शेतीवरच आमचं उत्पन्न अवलंबून आहे. दुष्काळ पडल्यास टँकरनं पाणीपुरवठा करतो."
दरम्यान, लोणीकर यांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना त्यांच्या कार्यकाळातील पाण्याची भीषण परिस्थिती मांडली. ते म्हणाले की, "केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाच सरकार 50 वर्ष असतानाही आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आमच्या शेतीचा प्रश्न सुटला नाही. लातूरला एवढे दिवस मुख्यमंत्रीपद होतं, परंतू त्यांना मुबलक पाणी मिळालं नाही."