सत्तेचा वापर शेतकरी हितासाठी करावा; यशोमती ठाकूरेंच्या टीकेवर रवी राणांची प्रतिक्रिया
सूरज दाहाट/अमरावती ; अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. हनुमान चालीसाचा गैरवापर केला म्हणून शेतकऱ्यांनी राणा दाम्पत्याला धडा शिकवला अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर यावर आमदार रवी राणा यांनी पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.
हनुमानजी आमच्या हृदयात आहे महाविकास आघाडी सरकारने मला हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकलं होतं, तर हनुमानजी माझे दैवत आहे. मी ज्या ज्या वेळी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं त्या त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी मला जेलमध्ये टाकलं तर बाजार समितीमध्ये यशोमती ठाकूर यांना आता सत्ता मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा वापर शेतकरी हितासाठी करावा व शेतकरी हिताची निर्णय घ्यावे तसेच सहकार क्षेत्रात माझी पहिली एन्ट्री होती मला याचा अनुभव नव्हता अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.
दरम्यान, नागपूर नंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 जागा विजयी झाल्या. यावेळी आमदार रवी राणा व भाजपच्या पॅनलचा यशोमती ठाकूर गटाने दारुण पराभव केला. यावेळी विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः रस्त्यावर येत मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा केला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडलं, हनुमान चालीसाचा गैरवापर करणाऱ्या राणा दाम्पत्याला शेतकऱ्यांनी धडा शिकवला राणा दाम्पत्याने चांदीचे नाणे वाटले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे. अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली, या निवडणुकीत आमदार रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा देखील निवडणूक रिंगणात होते मात्र यात सुनील राणा यांचा देखील पराभव झाला त्यामुळे राणा दाम्पत्याला कुठेतरी चिंतन करावा लागेल असंच या निमित्ताने म्हणावं लागेल.