"...म्हणून अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतो; आमदार रोहित पवारांच्या ट्वीटनं खळबळ
Rohit Pawar Tweet : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर टीकेची झोड उठल्यावर आमदार रोहित पवार ट्वीटरच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देतात. यावेळीही रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?
मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतो. आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे, ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.
परंतु, मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही. तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी.