Mobile Care In Monsoon : पावसाच्या पाण्यात मोबाईल भिजण्याची वाटतेय चिंता ?; 'या' टीप्स तुम्हाला पडतील उपयोगी, एकदा वाचाच
मोबाईल हा आपल्या अत्यावश्यक गरजांपैकी एक, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपले फोटो, आपल्या जिवलगांचे मोबाईल नंबर, त्यांच्या विषयीची माहिती, आपली माहिती अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये असतात. पूर्वी लोकं पुस्तकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये बुडालेली असायची. मात्र आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते. मोबाईलमुळे दूरच्या लोकांशी पण बोलता येते, मात्र याच मोबाईलमुळे जवळच्या लोकांशी आपला संपर्क तुटल्याने अनेकदा पाहायला मिळाले आहे. तरीही या अत्यावश्यक गोष्टीची काळजी ही घ्यावीच लागते. सध्या तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आपला मोबाईल पाण्याच्या संपर्कात येऊन खराब होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी काय करावे, हे आपण पाहणार आहोत.
मोबाईल काळजी अशी घ्यावी
पावसाळ्यात नेहमी घराबाहेर पडताना मोबाईलला पाणी लागून मोबाईल भिजू नये, यासाठी वॉटर प्रुफ फोन कव्हरचा वापर करावा.
तुमचा फोन शक्यतो झिपलॉक बॅगमध्ये ठेवावा. त्यामुळे आपला फोन पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो.
हात ओले असताना मोबाईलला स्पर्श करणे टाळा. अन्यथा तुमच्या हातातून मोबाईल सटकण्याची भीती असते.
मात्र इतके करूनही जर तुमचा मोबाईल पाण्यात पडला किंवा भिजला तर घाबरून न जाता योग्य त्या उपाययोजना केल्यास तुमचा फोन खराब होण्यापासून वाचू शकतो.
तुमचा मोबाइल जर पाण्यात पडला भिजला तर त्वरित त्याला सुक्या कपड्याने पुसा. आणि मोबाईल चालू असेल तर त्वरित तो बंद करा.
नंतर तो मोबाईल हेअर ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न करू नका. त्याउलट तुमचा मोबाईल तांदळाच्या डब्यात किंवा सिलिका जेलच्या पॅकेटच्या कंटेनरमध्ये ठेवा. हे पदार्थ ओलावा शोषून घेण्याचे काम करतात.
या घरगुती उपायांनी ही जर मोबाईल चालू झाला नाही, तर मात्र लवकरात लवकर मोबाईल दुकानाला भेट द्या.
यंदाच्या पावसाळ्यात थोडीशी खबरदारी घेतली तर आपला मोबाईल नक्कीच सुरक्षित राहू शकतो.