Mumbai Local : मुंबईकरांनो खुश व्हा ! उपनगरीय रेल्वेचे सर्व डबे आता एसी, तिकीट दरातही वाढ नाही ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबईच्या दैनंदिन जीवनात ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. उपनगरी रेल्वेच्या डब्यांचे आधुनिकीकरण करून त्यांना मेट्रोप्रमाणे एसी कोचमध्ये रूपांतरित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे, या बदलानंतरही प्रवाशांच्या खिशावर कोणताही भार पडणार नसून, तिकीट दरात ‘एकाही रुपयाची’ वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, उपनगरीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्थिती अतिशय कठीण असून, अपघाताच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. याला आळा बसावा म्हणूनच मेट्रोसारखी आधुनिक, एसी सुविधा असलेली आणि बंद दरवाज्यांची व्यवस्था असलेली डबे लोकलमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
“आजची मुंबई ही दोन वेगळ्या चेहऱ्यांनी विभागली गेली आहे. एकीकडे मेट्रो जिथे प्रवास सुखकर आहे आणि दुसरीकडे उपनगरी रेल्वे जिथे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे,” असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच रेल्वेमंत्री स्वतः मुंबईत येऊन या निर्णयाची अधिकृत घोषणा करतील. नवीन एसी कोचेस हे ‘रेट्रोफिटेड’ नसून, नव्याने विकसित आणि उच्च दर्जाचे असतील. दरवाजे पूर्णपणे सुरक्षित आणि बंद होणारे असतील, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळेल.
तिकीट दर ‘जैसे थे’ : प्रवाशांवर कोणताही आर्थिक भार नाही
या परिवर्तनानंतर प्रवाशांना तिकीट दरवाढीची चिंता वाटत असली, तरी मुख्यमंत्र्यांनी या शंकेवर पूर्णविराम दिला आहे. “या नव्या एसी लोकलसाठी एकही रुपयाची तिकीटवाढ होणार नाही. ही सुविधा सामान्य प्रवाशांसाठीच असून, त्यांना कोणताही आर्थिक भार न होता सुखकर, सुरक्षित प्रवासाची हमी देणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
नवी मुंबई विमानतळ आणि एज्यू सिटी प्रकल्पही अंतिम टप्प्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल्वेतील सुधारणांच्या जोडीने राज्याच्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांविषयीही माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते सप्टेंबर अखेरीस पूर्ण होईल, अशी घोषणा त्यांनी केली. या विमानतळामुळे राज्याच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट मिळणार आहे. “नवी मुंबईत एज्यू सिटीचा प्रकल्प सुरू आहे, जिथे जगभरातील नामांकित विद्यापीठं येणार आहेत. यामध्ये १० विदेशी विद्यापीठांना निमंत्रण दिलं असून, त्यापैकी ५ विद्यापीठांनी आधीच करार केला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शैक्षणिक केंद्र मिळणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.