MC Election News: कामाला लागा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीचे नगारे वाजले; मतदान कधी जाणून घ्या..
(MC Election News) राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Corporation Election 2025) अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेतली असून, या परिषदेत महापालिका निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणूक आयोगाने आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले होते, आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली होती. यामुळे सर्वांचे लक्ष महापालिका निवडणुकीच्या घोषणेकडे लागले होते. आयोगाने निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आणि आता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
29 महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या
सध्या राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत. याशिवाय, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही रखडलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी संपवाव्यात. या आदेशानंतर, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला होता. आता मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, प्रशासनिक तयारी आणि निवडणूक यंत्रणेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर, आता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचे मतदान आणि निकाल कधी होणार? हे जाणून घेऊयात.
उत्तर महाराष्ट्रातील निवडणुका आणि जागा
नाशिक महानगरपालिका – 122 जागा
अहिल्यानगर महानगरपालिका – 68 जागा
धुळे महानगरपालिका – 74 जागा
जळगाव महानगरपालिका – 75 जागा
मालेगाव महानगरपालिका – 84 जागा
MC निवडणूक बातम्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल:
नामनिर्देश स्वीकारण्याचा कालावधी: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
छाननी: 31 डिसेंबर
अर्ज माघारीची अंतिम तारीख: 2 जानेवारी
चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी: 3 जानेवारी
मतदान 15 जानेवारी 2026
मतमोजणी 16 जानेवारी 2026
आजपासून आचारसंहिता लागू
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. याचा अर्थ, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेवर काही मर्यादा येतील. निवडणुकीची घोषणा होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. उमेदवारांची निवड, जागावाटप, आणि प्रचार रणनिती यावर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शहरी राजकारणात चांगला उकळा होईल, हे नक्की आहे.

