विधिमंडळ अधिवेशनात नाना पटोलेंचं विरोधकांवर शरसंधान, म्हणाले; "भाजप आणि राज्य सरकार फेक नरेटिव्ह..."
Nana Patole Press Conference : दिक्षा भूमीतल्या मेन स्कूपला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये, अशी अनुयायांची मागणी आहे. तरीदेखील जे स्ट्रक्चर उभं केलं आहे, ते तोडण्याचं काम चालू आहे, त्यामुळे अनुयायी आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, धार्मिक गोष्टी, आस्था या सर्व गोष्टींची काळजी करुनच सरकारने तिथे पावलं उचलली पाहिजे. या पद्धतीचं वादंग निर्माण करून जनतेच्या आस्थेला धक्का लावू नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. तसच राज्य सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले, राज्यात बेरोजगारी का वाढली आहे? त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीत? भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार फेक नरेटिव्ह विधानसभेत टाकायला मागे पुढे पाहत नाहीत.
नाना पटोले पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, नीट परीक्षेवर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं. केंद्र सरकार स्वत: खूप पारदर्शक असल्यासारखं दाखवतं, त्याच नीट परीक्षेत गैरप्रकार होत असून विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होत आहे. त्यामुळे नीटची परीक्षाच रद्द झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रात नोकर भरतीत खासगी पोर्टलचा वापर करुन सरकार विद्यार्थ्यांना लुटतात. ते खासगी पोर्टल बंद झाले पाहिजेत. एमपीएससीच्या माध्यमातून ही सर्व पदे भरली पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे. इंडिया जिंकलं असेल, तर त्याचं प्रतिक त्यांनी समजलं पाहिजे.
भारताने जो विश्वकप जिंकला आहे, ती खऱ्या अर्थाने इंडियाची चांगली सुरुवात आहे. इंडियाच्या क्रिकेट टीमला काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. एनडीए नाही जिंकला, इंडिया जिंकली, त्यामुळे हे चित्र फडणवीसांना समजलं पाहिजे, असं म्हणत नाना पटोले यांनी फडणवीसांना टोला लगावला. हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती उत्सव साजरा करत आहेत. त्यांना भारतरत्न द्यावा, असा प्रस्तावही आम्ही विधानसभेत ठेवला आहे, असंही नाना पटोले म्हणाले.