मनुस्मृतीच्या वादात काँग्रेसची उडी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "मनुस्मृती महाराष्ट्रात लागू..."
Nana Patole On Manusmriti : मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसच जितेंद्र आव्हाड यांनी काल बुधवारी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला होता. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जे झालं आहे, त्याचं समर्थन करता येणार नाही, पण काँग्रेस पक्ष मनुस्मृतीचा सतत विरोध करत आहे. मनुस्मृती महाराष्ट्रात लागू करु दिली जाणार नाही.
पटाले माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, हा महाराष्ट्र शाहू-फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मनुस्मृती लागू केली जाऊ शकत नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत पटोले म्हणाले, महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. त्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही शेतात जा, तुम्हाला कुणीही थांबवणार नाही.
महाराष्ट्रातला शेतकरी तडफडत आहे. त्याच्या शेतात पाणी नाही. त्याला पिण्याचे पाणी मिळत नाही. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. त्यांची काळजी करणे, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. ट्वीटरवर टीव्ह टीव्ह करून चालणार नाही. प्रत्यक्षात मैदानात उतरुन काम करण्याची वेळ आहे. महाराष्ट्र पेटतोय आणि मुख्यमंत्री शेतात आराम करत असतील, तर यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला नाहीत, असंही नाना पटोले म्हणाले.