...नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारविरोधात गुन्हे दाखल करू; नाना पटोलेंनी दिला इशारा
Nana Patole Press Conference : शेतकऱ्याला पिककर्ज देण्यासाठी बँकेचे अधिकारी लाच मागतात. तो लाच देऊ शकला नाही, म्हणून त्या अधिकाऱ्याने त्याचं पीककर्ज रद्द करण्याची धमकी दिली. त्यामुळे तो शेतकरी अडणचीत आला आणि त्याने आत्महत्या केली. पुन्हा विठ्ठलसारखा शेतकरी आत्महत्या करणार नाही. याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. सरकारच या सर्व व्यवस्थेला प्रोत्साहन करत आहे.सरकारने या उपाययोजना पूर्ण केल्या नाहीत, तर काँग्रेस सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर लढाई लढेल. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारवर गुन्हे दाखल करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिला आहे.
पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, मोदी सांगायचे की प्रत्येक घरात नळ आणि पाणी दिलं जाईल. आता घरच दिलं नाही, तर पाणी कुठून देणार, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी सरकारला सूचना देतो की, ही राजकारणाची वेळ नाही. तातडीने शेतकऱ्यांच्या फळबागांना २ लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत दिली पाहिजे. शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी तातडीनं मदत केली पाहिजे.
दुष्काळामुळे बागाच्या बाग जळल्या आहेत. म्हणून त्यांना २ लाख रुपये हेक्टरी इतकी मदत सरकारने करावी. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं दिलं पाहिजे. ब्लॅक मार्केटिंग थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवली पाहिजे. ज्या गावात पिण्याचं पाणी नाही, त्या गावात पाण्याची उपलब्धता करून देण्याचं काम सरकारने करावं. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे, त्यांना पिकविमा मिळाला पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले.