बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो; सुषमा अंधारेंवर टीका
निकेश शार्दूल : ठाणे | बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो. त्याला अर्थ, निष्ठा, बांधिलकी, विचार यांच्याशी संबंध नसते, अशा शब्दात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना म्हस्के म्हणाले, कालपर्यंत अंधारे या हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या. काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात.
दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केलं होतं. अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.तसेच म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, ठाकरे गटाचा मुंबईतच्या निवडणुकीत जीव अडकला आहे. उत्तर भारतीयांची मते मिळावी, यासाठी त्यांच्यात सहानुभूती निर्माण व्हावी, याकरिता ठाकरे यांनी बिहारचा दौरा आयोजित केला असावा.
मात्र आपण पहिले तर लालू प्रसाद यादव यांनी शिवसेनेला नेहमीच विरोध केला आहे. बाळासाहेबांच्या विरोधात ते कायमच बोलत आले आहेत. आता हीच लोकं ठाकरेंना जवळची वाटत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.आता म्हस्के यांच्या या टीकेवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.