राज्याला हुडहुडी, नाशिकच्या ओझरमध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
महेश महाले : नाशिक | जोरदार पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशआणि जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे राज्यामधील अनेक शहरं गारठली आहेत.
2 दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली आलं आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्यात. उबदार कपडे कपाटामधून बाहेर आलेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांची संख्याही वाढू लागली आहे.निफाड तालुक्यातील ओझरमध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. धुळ्यात 7, पुण्यात 10, अहमदनगरमध्ये 9.8 अंशांपर्यंत खाली आलाय. मुंबईतही यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा 20 अंशाखाली घसरला असून पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी असेल असा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याचा अंदाज आहे.