Operation Sindoor - IPL 2025 : क्रिकेटप्रेमींना दिलासा; अंतिम सामन्यांपर्यंत वेळापत्रकात बदल नाही
भारतीय लष्कराने Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली. ही कारवाई २२ एप्रिल रोजी पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तथापि, या लष्करी कारवाईचा IPL वर कोणताही परिणाम होणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे. “स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडेल,” असे BCCIच्या एका अधिकाऱ्याने ANI वृत्तसंस्थेने सांगितले आहे.
IPL हंगामातील आता 18 सामने शिल्लक
IPL 2025 हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी झाली असून यंदा एकूण 74 सामने खेळवले जातील. मंगळवारपर्यंत 56 सामने पार पडले असून आता अंतिम सामना धरून 18 सामने बाकी आहेत. अंतिम सामना 25 मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात कोलकातामध्येच खेळवला जाणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला: देश हादरला
22 एप्रिल रोजी बैसरन व्हॅली (पहलगाम) येथे पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भीषण घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एका नेपाळी नागरिकाचाही समावेश होता. 10 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती.
IPL चे देशाबाहेरचे हंगाम – ऐतिहासिक पार्श्वभूमी
2009: लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत
2014: पहिला टप्पा यूएईमध्ये, नंतर भारतात
2020: कोरोनामुळे संपूर्ण हंगाम यूएईमध्ये
2021: भारतात सुरू झालेली स्पर्धा नंतर यूएईत हलवली गेली
IPL चा हा 18 वा हंगाम असून, आतापर्यंत चार वेळा तो देशाबाहेर खेळवण्यात आला आहे. मात्र, यंदा कोणतेही धोका नसल्याने संपूर्ण स्पर्धा भारतातच पार पडणार आहे.