Operation Sindoor: भारत माता की जय! भारताचा पाकिस्तानवर हल्ला; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.
भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री दीड वाजता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑपरेशन सिंदूर मॅानिटर करत होते. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.