Pahalgam Terrorist Attack : राज्य सरकारने केली मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम भागात काल मंगळवारी (22 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास एकच खळबळ उडाली होती. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सरकारने आता मोठी घोषणा केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतुल मोने, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणवते, दिलीप डिसले, संजय लेले, हेमंत जोशी या राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृत्य पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबईत आणले. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो - सीएम फडणवीस
"पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत." अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.