"माझ्या मुलांच्या उपचारासाठी भारतात राहू द्या"; पाकिस्तानी नागरिकाची विनंती
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर जाण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाने काही पाकिस्तानी नागरिक नाराज झाले असून आम्हाला भारतातच राहू द्या, अशी विनंती करत आहेत. आपल्या दोन मुलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीने भारत आणि पाकिस्तन या दोन्ही सरकारांना विनंती केली आहे की, त्यांना घरी परतण्यास भाग पाडण्यापूर्वी त्यांचे उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान सार्क व्हिसा विशेषाधिकार रद्द करण्यात आल्याने प्रभावित झालेल्यांमध्ये सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे. या पाकिस्तानी नागरिकाने जिओ न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की, त्यांची ९ आणि ७ वर्षांची मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. "त्यांना हृदयविकार आहे आणि येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. परंतु पहलगाम घटनेनंतर, आम्हाला ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगण्यात आले आहे," असे ते म्हणाले, पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे.
रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करत आहेत. परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयाने त्यांना तातडीने दिल्ली सोडण्यास सांगितले आहे, असे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. "मी सरकारांना आवाहन करतो की, त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. कारण आम्ही आमच्या प्रवासावर, राहण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत," असे त्या व्यक्तीने म्हटले आहे.
मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. हा २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील सर्वात भीषण हल्ला होता. त्यावर कारवाई म्हणून बुधवारी नवी दिल्ली येथे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली आणि इतर निर्णयांसह, अटारी येथील एकात्मिक चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.