Pankaja Munde
Pankaja Munde

बीडमध्ये पंकजा मुंडेंनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग, म्हणाल्या; "माझ्या वैभवाला दृष्ट..."

बीडच्या सभेत पंकजा मुंडे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Published by :
Naresh Shende
Published on

ईश्वरसुद्धा अग्निपरीक्षा घेतो. ग्रह, तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात. नेतेसुद्धा अग्निपरीक्षा घेतात. या अग्निपरीक्षेला सामोरं जाऊन तुमच्या बहिणीला संधी मिळाली आहे. या संधीमुळं हृदयाचे तलवारीने दोन भाग करावे, अशी परिस्थिती झालीय. माझं खूप मोठं भाग्य आहे आणि गोपिनाथ मुंडे यांचे किती संस्कार आहेत. एका क्षणात माझा निर्णय झाला आणि माझ्या स्वागताला प्रीतम मुंडे आल्या. ही निवडणूक सोपी नाहीय. म्हणूनच मी आहे. मला सोपं सोपं काम करायचं नाहीय. सभेला जमलेली एव्हढी लोकं पाहून मला भीती वाटते की, माझ्या वैभवाला दृष्ट लागायला नको. सर्वच म्हणतात पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजेत. पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजेत. हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागली नाही पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पंकजा मुंडे जनतेला संबोधीत करताना म्हणाल्या, विकासावर काळे ढग आले, तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजेत, असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी केला पाहिजे. मला प्रीतमच्या जागेवर खासदारकीची तिकीट मिळेल, मी पुढे आमदार होईल की मंत्री होईल, हेही मला माहित नव्हतं. माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांच्या ओझं होतं. मला केंद्रात मंत्रिपद देण्याची चर्चा होती, तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली, मला मंत्रिपद नको.

मला कोअर कमिटीत घ्या. कारण गोपिनाथ मुंडे यांनी अनेक डोळ्यांत स्वप्न टाकली आहेत. ती स्वप्न पूर्ण करायची आहेत. म्हणून ३०-४० लोकांना मी तिकीट देऊ शकले. ते निवडून येऊन आज आमदार, खासदार आहेत. पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणला प्रत्येकवेळी कुणाची दृष्ट लागते, मला कळत नाही,निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते.

मागे झालेला पराभव हा संपूर्ण बीड जिल्ह्याचा होता, कारण मी खूप जीव लावून तुमच्यासाठी काम केलं होतंमुख्यमंत्री ग्रामसडक योजना मी नाही केली. मी बचत गटांना पैशे दिले नाहीत. तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी हे सर्व केलं. हे राष्ट्रीय महामार्ग खासदार प्रीतम मुंडे आणि मी नाही आणले. हे आमच्याकडे असलेल्या पदांमुळे झाले. पदाचा संगम जेव्हा निधीशी आणि नियतीशी होतो, पद ज्याच्या हातात आहे, तेव्हा त्याची निती स्पष्ट असते. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट नसते, तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होतं.

प्रत्येत जातीचं भलं होतं. मागच्यावेळीही मी प्रत्येकाच्या घरात जाऊन पदर पसरला होता आणि म्हणाले होते, माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या. आता मी एव्हढच म्हणेल ही शेवटची संधी मला द्या. खासदार झाल्यावर तुम्हाला जे पाहिजे, ते मी रात्रंदिवस काम करुन देईल. पण ही शेवटची संधी मला द्या. मला नावाची प्रसिद्धीची लालसा वाटत नाही.

मी म्हणजे गोपिनाथ मुंडे नाही. पण गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते स्वप्न पूर्ण करण्याची अशी संधी आता येणार नाही. पाच वर्ष मी घरी बसले. पण तुमच्यासाठी तळतळ जीव तुटत होता. मला बंगले बांधायचे नाहीत. मला गाड्या घ्यायच्या नाहीत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com