Pankaja Munde
Pankaja Munde

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."

बीडच्या महायुतीच्या सभेत पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधीत करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

Pankaja Munde Speech : पालकमंत्री म्हणून मी बीड जिल्ह्याची सेवा केली. परळीची सेवा केली. सगळे विकास करून निवडून येता येत नाही, हे वाक्य मी अनेकदा ऐकलं होतं, ते सत्य झालं. मला तुम्ही परळीतून घरी बसवलं. घरी बसल्यानंतर मला पाच वर्ष संघटनेचं काम करता आलं. या संघटनेतच्या कामाचा माझा अनुभव फार मोलाचा आहे. गोपिनाथ मुंडे १९८५ ला निवडणूक हरले होते. तेव्हा लोकांच्या मनात सुप्त दु:ख निर्माण झालं होतं. माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासोबत सतत काम करणारे कार्यकर्ते माझ्यासाठी मोलाचे राहतील. कारण बाबा गेल्यावर त्यांनी मला सोडलं नाही, त्यांचं माझं नातं कायम राहील. मी खासदार झाल्यावर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांची काळजी घेईल. मला लोकसभेत का जायचंय? कारण मला जिंकायचंच आहे आणि मी जिंकणारच.

जनतेला संबोधीत करताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, या परळी मतदारसंघात दुप्पट तिप्पटीने लीड घ्यायचा आहे. कारण इथे विरोधकाला स्थान नाही. मला या पुढचा टप्पा गाठून या भागात मोठे उद्योग आणायचे आहेत. कारण उद्योग आणण्यासाठी आता तसं वातावरण आहे. उद्योग आणण्यासाठी रेल्वे आहेत, उद्योग आणण्यासाठी नॅशनल हायवे आहे. या भागात मला मोठा मल्टिस्पेशलिटी रुग्णालय सुरु करायचा आहे.

माझ्या जिल्ह्यातील आणि आजबाजूच्या कर्करोगग्रस्त लोकांना मोफत उपचार द्यायचे आहेत. निवडणुकीच्या निकालाची तारीख ४ जूनला आहे. ४ जूनला मी याच हाताने मुंडे साहेबांचं अंत्यसंस्कार केलं आहे. मी मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी मतदान केलं नाही. मुंडे साहेबांकडे बघून मला मतं द्या, असंही मी म्हणणार नाही. मी जी कहाणी सुरु केली आहे, त्या कहाणीला पूर्ण करण्यासाठीच ४ जूनला निकाल आहे, असं मला वाटतं. मला विधानसभा न मागता मिळाली. मला लोकसभा न मागता मिळाली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com