"...तर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार", उपमुख्यमंत्री अजित पवारांचं धाराशिवमध्ये मोठं विधान
ही निवडणूक गावकीची, भावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाच्या १४० कोटी जनतेनं पुन्हा पाच वर्षांसाठी कुणाच्या हातात कारभार द्यायचा, यासाठी आहे. कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीनं चालतं. कारभारी चांगला नसेल, तर घर टीकत नाही. तसाच तुमचा आपला भारत देश, सर्व भारतीयांचं घर आहे. गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींनी जगात या देशाचं नावलौकीक वाढवण्याचं काम केलं. आज जगात कोणत्याही देशात गेलात, तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अतिशय आदराचा झाला आहे. ही किमया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिवमध्ये जनतेला संबोधीत करताना म्हणाले.
अजित पवार धाराशिवमध्ये म्हणाले, आज आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहोत. मी अनेकदा माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या सासुरवाडीत आलोय. पण अशी अलोट गर्दी मी पहिल्यांदाच पाहतोय. मोदींनी जगभरात देशाचे संबंध चांगले ठेवले आहेत. जपानचं सरकार अर्ध्या टक्के व्याजानं आपल्याला निधी देतो. या माध्यमातून आपण मोठ मोठे प्रकल्प तयार करत आहोत.
शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहोत. राज्य शासन ५० कोटी आणि नरेंद्र मोदी ५० कोटी अशाप्रकारे १०० कोटी रुपये विकासासाठी दिले जातात. या सरकारनं सर्व जातीधर्मांचा, गरिबांचा विचार करुन ३ कोटी घर देण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी मागचा पुढचा विचार करुन कोणतेही काम करतात. मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
लोक सांगतात आम्हाला १२ तासच वीज मिळते. आम्हाला दिवसा वीज पाहिजे. त्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही साडेआठ लाख सोलार पंप द्यायचे. सूर्य उगवला कि पंप चालू. सूर्य मावळला की तुमच्या शेतीचा पंप बंद. रात्री अपरात्री साप, बिबट्यांची भिती असते. त्यासाठी सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. हे सरकार तुमचं आहे. शासन आपल्या दारी आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्याचं दु:ख आम्हाला माहित आहे. आचारसंहिता संपल्यावर आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत.