जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नियमांचे पालन न केल्यास कारवाई

जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नियमांचे पालन न केल्यास कारवाई

गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

अभिराज उबळे|सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले.

जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस यापूर्वीच अधिकार प्रदान केले असले तरी शासन अधिसूचना मधील अटी व शर्थीच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत आयोजनास परवानगी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १६ डिसेंबर २०२१ रोजीच्या निर्णयानुसार घटनापिठाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून १० डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र क्रूरतेने वाघविण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम २०१७ मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी तसेच महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन अधिसूचना, शासन निर्णय, शासन परिपत्रकामधील अटी व शर्थींचे पालन आयोजकांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक राहील, शर्यतीतील सर्व बैलांच्या जोड्यांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील, तसेच शासन परिपत्रकातील अटी व शर्थीनुसार नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, ज्या गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात येणार आहे. त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याबाबत शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक राहील.

आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे

बैलगाडी शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com