India vs Pakistan War : देशातील 28 विमानतळं 15 मेपर्यंत राहणार बंद; सुरक्षेच्या कारणास्तव उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सशस्त्र दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीमावर्ती भागातील परिस्थिती आणि शस्त्रसज्जतेचा आढावा यावर उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील उपस्थित होते.
गुरुवारी रात्री पाकिस्ताननं भारतीय हद्दीतील सीमावर्ती भागात हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. रहिवासी परिसरासह सैनिकी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आले. मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. या सगळ्या घडामोडींच्या संबंधीत पंतप्रधान मोदींनी सैन्याच्या तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली.
या निर्णयांवर शिक्कामोर्तब
भारतानं जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, चंदिगढ, जोधपूरसह 28 विमानतळ बंद केले आहेत. 28 विमानतळ 15 मेच्या सकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद असणार आहेत. त्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेटनं या शहरांमधून होणारी उड्डाणं रद्द केली आहेत. पाकिस्तानी हल्ल्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आणि लष्करी तयारी अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच सीमा सुरक्षा दल आणि अन्य केंद्रीय दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे.
ही विमानतळं बंद
पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पटियाला, भटिंजा, हलवाडा, पठाणकोट
हिमाचल प्रदेशातील भुंतर, शिमला, कांगडा-गग्गल,
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील श्रीनगर, जम्मू, लेह,
राजस्थानमधील किशनगढ, जसलमेर, जोधपूर, बिकानेर,
गुजरातमधील मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज
केंद्रशासित प्रदेशातील चंदिगढ