"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं
मोदी सरकारचे दहा वर्ष आणि काँग्रेसचे ६० वर्ष, यामध्ये असलेला फरक आपण पाहत आहोत. मागील ६० वर्षात पंचायतींपासून संसदेपर्यंत काँग्रेसचंच राज्य होतं. विरोधी पक्ष नव्हता. कुणाचाच आवाज नव्हता. पण काँग्रेसने ६० वर्षे जे केलं नाही, ते तुमच्या सेवकाने (नरेंद्र मोदी) करुन दाखवलं. मागील ६० वर्षात काँग्रेसच्या सर्व प्रधानमंत्र्यांकडून गरिबी हटवणार, अशा घोषणा देण्यात आल्या. पण काँग्रेसने गरिबी हटवली नाही. तुमच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं. कुणाला गरिबीतून बाहेर काढलं, तर पुण्य मिळतं. त्या पुण्याचे हक्कदार तुम्हीच आहात. कारण मोदींना मत देऊन हे काम करण्याची संधी तुम्ही दिली होती. ८० कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे. याचं पुण्याही तुम्हाला मिळतं. देशात जेव्हा मजबूत सरकार असतं, तेव्हा वर्तमानासोबत भविष्यातील योजनांकडेही लक्ष दिलं जातं. भाजप सरकारने रल्वे, रस्ते आणि विमानतळांसाठी अभूतपूर्व खर्च केला आहे. काँग्रेसने दहा वर्षात जेव्हढा खर्च केला आहे, तेव्हढा खर्च आम्ही एका वर्षात करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते माळशिरसमध्ये महायुतीच्या सभेत बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना मोदी म्हणाले, महाराष्ट्राची जनता जेव्हा आशीर्वाद देते, तेव्हा कोणतीच कसर सोडत नाही. पण कोणी वचन पूर्ण करत नाही, तेव्हाही महाराष्ट्राची जनता चोख प्रत्युत्तर देते. ज्यांनी महाराष्ट्रात पाणी पोहोचवलं नाही, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. विदर्भ, मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी तडपवण्याचं पाप गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु होतं. काँग्रेसने ६० वर्षांपर्यंत देशाने काम करण्याची संधी दिली. ६० वर्षात दुसरे देश विकसीत झाले. पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना काँग्रेसने पाणीही दिलं नाही. २०१४ च्या आधी देशात जवळपास १०० सिंचन योजना रखडल्या होत्या. प्रत्येक शेतात आणि घरात पाणी पोहोचवणं माझ्या आयुष्यातील खूप मोठं मिशन आहे. २०१४ मध्ये आमचं सरकार आल्यावर मी पूर्ण शक्ती सिंचन योजना सुरु करण्यात लावली.
देश जेव्हा स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करत होतो, तेव्हा मोदींनी स्वत:साठी आणि सरकारसाठी काम करण्याचा स्वार्थी विचार केला नाही. तेव्हा मी संकल्प केला होता, देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ वर्षांच्या महोत्सवात ७५ अमृत सरोवर बनवणार. अमृत सरोवर अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पाणी पोहोचवण्याचं काम करण्यात आलं. २०१४ च्या आधी विरोधकांचं सरकार होतं, तेव्हा देशात काय परिस्थिती होती, हे शेतकऱ्यांना माहित आहे. एनडीएचं सरकार आल्यावर आम्ही साखर कारखान्यांना १० हजार कोटी रुपयांचं प्राप्तिकर माफ केलं. याचा फायदा आपल्या उसाच्या शेतकऱ्यांना झाला. मार्च २०२३ पासून साखर कारखान्यांसाठी आम्ही १० हजार कोटींचं विशेष कर्जाचं पॅकेजही दिलं आहे. ज्यामुळे साखर कारखाने प्रत्येक काम वेगानं करावं आणि शेतकऱ्यांना पैसेही मिळतील.
वारकरी सांप्रदाय, अनेक संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या प्रेरणेतून मोदी विकसीत भारतासाठी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आले आहेत. सर्वात आधी मी तुमची माफी मागतो. देशाच्या राजकारण्यांना सवय लागली आहे, सभा अकरा वाजता असेल,तर नेते एक वाजता पोहचतात. पण तुम्हालाही या गोष्टींची सवय झाली आहे. मी वेळेवर येतो, ही माझी समस्या आहे. त्यामुळे खूप लोकांवर अन्याय होतो. इतक्या मोठ्या संख्येत लोक आले आहेत, जे सभेला पोहोचले नाहीत, त्यांची मी माफी मागतो. मला दुसऱ्या सभेलाही जायचं आहे. प्रेमात खूप मोठी ताकद असते. मला आशीर्वाद देण्यासाठी मातभगिनी आल्या आहेत. जीवनात यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणताच असू शकत नाही, असंही मोदी म्हणाले.