Posters
PostersTeam Lokshahi

"भाजप नेत्यांवर, भाजपमध्ये गेलेल्यांवर ED, CBI कारवाई झाल्याचं दाखवा अन् लाख रुपये मिळवा"

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडून केंद्रीय यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना ईडीकडून काल मध्यरात्री अटक करण्यात आली. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने अटक केली. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपसोबत गेले अन् सत्ता स्थापन केली. यातील अनेकांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा पुढे सुरु राहिल्याचं दिसलं नाही. एकुणच भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षातील लोकांवर दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातोय. याच विषयाला धरुन काही बॅनर औरंगाबादमध्ये (Aurangabad) झळकल्याचं दिसतंय.

औरंगाबादमधील क्रांती चौकात राष्ट्रवादी पदाधिकारी अक्षय पाटील यांनी एक बॅनर लावलं असून, "भाजप नेत्यांवर ईडी सीबीआय आयकर विभागाची कारवाई झाल्याचं, भाजपमध्ये गेलेल्यांची कारवाई पुढे चालू राहिल्याचं दाखवा अन् लाख रुपये मिळवा" असं आवाहन करण्यात आलं आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे बॅनर लावल्याची माहिती समोर आली असून, या बॅनरची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.

Posters
उध्दव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबियांची भेट

उद्धव ठाकरेंनी साधला केंद्रीय यंत्रणा, भाजपवर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज संजय राऊतांच्या घरी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही अत्यंत वाईट पद्धतीनं केली जात असून, संजय राऊत यांच्या हिंमतीचा आपल्याला अभिमान वाटतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना वाटेल ते करुन अडकवायचं आणि संपवण्याचा प्रयत्न करायचा असं राजकारण भाजपकडून होतोय. मात्र काळ बदलत असतो, 60 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची अवस्था आज काय आहे हे पाहून लक्षात घ्यायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या ज्या वेळी संकट आलं त्यावेळी संजय राऊत हे त्यांच्यासाठी उभे होते. त्यामुळे आता संजय राऊतांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार का? असा सवाल उपस्थित होत होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्या घरी जात, त्यांच्या कुटुंबाला धीर दिला आणि स्पष्ट केलं की या प्रकरणात आपण आणि आपला पक्ष संजय राऊत यांच्या कुटुंबासोबत आहोत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अत्यंत गंभीर आरोप भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर केले आहे. मी सुद्धा मुख्यमंत्री झालो होतो, मात्र माझ्या डोक्यात कधी ती हवा गेले नाही. त्यामुळे आज जे लोक सत्तेत आहेत, त्यांनाही मी हेच सांगेल की, सत्तेची नशा होऊ देऊ नका.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com