Prakash Ambedkar On Sharad Pawar : "शरद पवारांचा दावा हा ‘वरातीमागून घोडे’; मंडल यात्रेवरूनही प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल"
Prakash Ambedkar On Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या 160 जागांच्या दाव्यावर तीव्र शब्दांत टीका करत त्याची तुलना ‘वरातीमागून घोडे’ अशा दिखाव्याशी केली. त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम प्रकरणी सर्व पक्षांना कोर्टात जाण्याचं आवाहन त्यांनी आधीच केलं होतं, मात्र त्यावेळी कोणी साथ दिली नाही. आता केवळ बोलून काही उपयोग नसल्याचं ते म्हणाले.
आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, मुंबई उच्च न्यायालयात याचिका फेटाळली गेल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. “तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही मोदींना घाबरत नसाल, तर या लढ्यात आमच्यात सामील व्हा,” असा सल्ला त्यांनी पवारांना दिला.
राहुल गांधींशी झालेल्या भेटीबाबतही आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित करत, त्या भेटीत उपस्थित असलेल्या दोन व्यक्तींची नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलं. “सामान्य जनतेला फसवू नका. जिथे खरी लढाई आहे तिथे हे लोक लढत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
‘मंडल यात्रे’बाबत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला विरोध केल्याचा आरोप केला. ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाणार नाही, कारण श्रीमंत मराठा हा एनसीपीचा आधार असल्याने, या यात्रेचा उद्देश ओबीसी कल्याण नसून राजकीय समीकरण साधणं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, क्रांती दिनानिमित्त नागपूरातून शरद पवारांच्या हस्ते मंडल यात्रेला प्रारंभ झाला असून, 52 दिवसांची ही मोहीम राज्यभर फिरणार आहे. ओबीसींसाठी झालेल्या कामांचा आढावा घेणं आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची आठवण करून देणं हा यात्रेचा उद्देश असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. मात्र, भाजप- महायुतीसोबतच आता आंबेडकरांच्या टीकेमुळेही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.