Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढला
( Khadakwasla Dam ) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा जमा झाला असून, आज सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 13.16 टीएमसी (टक्केवारीने 45.13 %) पाणीसाठा नोंदवला गेला आहे. हा साठा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल चारपट अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी फक्त 3.57 टीएमसी (12.24 %) पाणी साठले होते.
गेल्या 24 तासांत चारही धरणांमध्ये एकूण 487 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने भर पडली आहे. यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. खडकवासला धरणातून गेल्या आठ दिवसांपासून मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. आतापर्यंत सुमारे 2.43 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले असून, सध्या धरणाची पाण्याची पातळी सुमारे 1.20 टीएमसीवर स्थिर आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसावर सतत लक्ष ठेवून नियोजनबद्ध विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पावसाचा हा जोर असाच राहिला, तर पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. प्रशासनाने धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसाची सतत निगराणी ठेवत आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुणेकरांसाठी सध्या दिलासादायक स्थिती असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरण साखळीत समाधानकारक साठा जमल्याने शहराचा पाणीप्रश्न दूर होण्याची शक्यता आहे.