लम्पी आजारावर लक्ष ठेऊन आहोत : राधाकृष्ण विखे पाटील
राज्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ आहेत. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या लम्पी आजाराच्या परिस्थितीचा आढावा राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील 21 जिल्हे लम्पीने प्रभावित आहेत. राज्यात एकूण 42 मृत्यू झाले आहेत. परंतु, अन्य राज्याच्या तुलनेत आपण वेळेत पाऊल उचलले आहे. 6 लाख पशुच लसीकरण झालं आहे. 75 लाख वॅक्सिन उपलब्ध आहे. प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही सरकार म्हणून जागरूक आहोत. 24/7आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सर्व खर्च शासन करणार आहे.
पुढे म्हणाले, शहरी भागात मुंबई सारख्या शहरात महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. पशूंच्या आंतरराज्यीय वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. बाजारांवर वर देखील बंदी घालण्यात आली आहे. वॅक्सिनसाठी डॉक्टर कमी होते. त्यामुळे इंटर्न डॉक्टर आणि खासगी डॉक्टरला देखील सहभागी करून घेत आहोत. पालक मंत्री संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. पण काम कुठे ही थांबलेले नाही. पण विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
शिर्डी संस्थान बाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यावर बोलणे योग्य नाही. दुधा बाबत कोणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर सरकार कारवाई करेल. तसेच सध्याच्या परिस्थितीचा कुणी लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कारवाई करणार, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.