Indigo flights cancelled : Indigo च्या फ्लाईट रद्द झाल्याने ; राहुल गांधी आक्रमक
इंडिगो कंपनीच्या फ्लाईट रद्द झाल्याने संपूर्ण देशामध्ये गोंधळ उडाला आहे. कंपनीच्या सर्व फ्लाईटचे उड्डाण रद्द होत असल्यामुळे देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर गोंधळ उडालाा आहे. 12 तासांहून अधिक तास प्रवासी न खाता पिता विमानतळावर ताटकळत उभे आहेत. इंडिगो कंपनीला (Indigo) पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाइनला संपूर्ण देशात 550 हून अधिक फाईट रद्द केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने सलग तिसऱ्या दिवशी उड्डाणे रद्द करणे आणि विलंब करणे यावरून गोंधळ उडाला आहे. यामुळे राजकीय वाद देखील निर्माण झाला. सध्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि हे सरकारच्या “मोनोपॉली मॉडेल” आर्थिक धोरणांचे परिणाम असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका वृत्तपत्रातील एक लेख शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की इंडिगोचे संकट ही या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत आहे. सामान्य भारतीय पुन्हा एकदा उड्डाण विलंब, रद्दीकरण आणि असहाय्यतेचा सामना करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा हवी आहे, मॅच फिक्सिंगसारख्या मक्तेदारीचा नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
त्यांनी आरोप केला की देशातील संस्था आता सामान्य लोकांसाठी काम करत नाहीत, तर मक्तेदार गटांसाठी काम करत आहेत. लाखो छोटे व्यवसाय कोसळत आहेत आणि रोजगार निर्माण होत नाहीत. राहुल गांधी यांनी व्यावसायिकांवरही हल्ला चढवला आणि म्हटले की सरकार आणि मक्तेदारांच्या दबावामुळे त्यांना त्यांचे व्यवसाय विकावे लागत आहेत. त्यांना आयटी, सीबीआय आणि ईडीकडून छापे पडण्याची भीती वाटते.
राजकारण नेहमीच कमकुवत लोकांसाठी कार्यरत
राहुल गांधी यांनी काही प्रामाणिक उद्योगपतींचाही उल्लेख केला जे मक्तेदारीशिवाय यश मिळवत आहेत. राहुल गांधी म्हणाले की त्यांचे राजकारण नेहमीच कमकुवत आणि आवाजहीन लोकांसाठी राहिले आहे, परंतु आता त्यांना समजले आहे की व्यापारी समुदायावरही अन्याय होत आहे. सरकारने इतरांच्या खर्चावर कोणत्याही एका व्यवसायाला प्रोत्साहन देऊ नये आणि दबाव आणण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करू नये. ते म्हणाले की बँकांनी केवळ मोठ्या कर्जदारांवर अवलंबून राहण्याऐवजी ‘निष्पक्ष व्यवसाय’ करण्यास पाठिंबा द्यावा, असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
