Raj Thackeray | मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंकडून कविता सादर
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांसह अनेक दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कवितांची मैफील रंगली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कविता म्हटली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम कविता सादर करत या मैफिलीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’मधील एक काव्य सादर केले. ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं; मला कल्पना नाही. आज मी जे काही काव्य निवडलं आहे ते तुम्ही ऐकलं नसेल, असं मला वाटत आहे. जर ऐकलं असेल तर आनंदच आहे. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती यामधील हे काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून हे काव्य लिहिलेलं आहे. यात बाबासाहेबांचं म्हणणं ते महाराजांविषयी लिहिताना, त्यांच्याकडे बघताना ते काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. या कवितेचे शीर्षक आहे कोण तू रे कोण तू…., असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
राज ठाकरेंनी म्हटलेली कविता
“कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रू तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतील त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ती तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद्घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ? की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ? कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ? चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ? तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ? मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ? द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ? गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं ! संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं ! कोण तूं रे कोण तूं…….कोण तूं रे कोण तूं !”