22 फेब्रुवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी पैठणमध्ये पार पडली.यावेळी राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करणारे कुणाच्या इशाऱ्यानं काम करत आहेत. तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरच याचा उद्रेक होईल असे शेट्टी म्हणाले.
यासोबतच थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे.