टोमॅटो खाल्ला नाही तर शेट्टी मरणार नाही - रविकांत तुपकर
महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यासर्व महागाईचा त्रास सामन्यांना होत आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की, टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. असे म्हटले होते.
यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टीवर टीका केली आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, दोन चार वर्षात एखादाच महिना असा येतो की टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. लोक हे त्यांचे भांडवल करतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये. असे रविकांत तुपकर म्हणाले.
तसेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीसुद्धा सुनील शेट्टीवर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्याची भूमिका साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये घेता, मग शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर पोटात दुखतंय का? सडक्या विचाराचा सुनील शेट्टी भिक मागायला आला तर त्याला सडके टोमॅटोच द्या, असे सदाभाऊ खोत म्हणाले.