मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यामागचा खरा दोषी कोण? मंत्री रविंद्र चव्हाण ट्वीटरवर म्हणाले; "आज विधानपरिषदेत..."
Ravindra Chavan Tweet : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते. आमदार विक्रम काळे यांनी या प्रश्नावरून मंत्री रवींद चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. काळे म्हणाले, रवींद्र चव्हाण यांचे पेपरमध्ये फोटो येतात, पण हा रस्ता पूर्ण का झालेला नाही? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला. यावर रविंद्र चव्हाण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
रविंद्र चव्हाण ट्वीटरवर काय म्हणाले?
मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यामागचा खरा दोषी कोण? हे जनतेनेच ठरवावं. मी कोकणचा सुपुत्र आहे, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे कोकणवासीयांना जे सहन करावं लागलं त्याची आम्हाला कल्पना आहे. पण यामागचे खरे दोषी कोण आहेत? हे आज विधानपरिषदेत विस्तृतपणे सांगत होतो. 'मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?' या प्रकरणाचं पूर्ण सत्य उलगडू लागल्यावर विरोधकांचे धाबे दणाणले.
कोकणवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाचं उत्तर विरोधक शांतपणे ऐकून घेतील, अशी आशा होती. परंतु विरोधकांनी सभेत इतका गोंधळ माजवला की विधान परिषदेचे सत्र तहकूब करण्याशिवाय दूसरा पर्याय उरला नाही. मला या प्रकरणावर पूर्ण प्रकाश टाकण्यापासून अडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी नेमका का केला? मुंबई-गोवा महामार्गाचं पूर्ण सत्य जनतेच्या समोर येण्याची विरोधकांना धास्ती का वाटते? याचं उत्तर आता जनतेने विरोधकांनाच विचारायला हवं.