"...म्हणून ती सुई डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे वळली"; आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितलं
Ravindra Dhangekar Press Conference : जो अपघात झाला, त्या अपघातात दोन मुलं मृत्यूमुखी पडली. ते मध्यप्रदेशचे होते. त्यांच्या कुटुंबियांचा आधार ती दोन मुलं होती. ससूनच्या आवारात अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पैसे खाऊन दोन एफआयआर लिहिल्या. एका एफआयआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं. पुणेकर रस्त्यावर आल्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले. फडणवीसांनी सारवासारव केली आणि निघून गेले. पण पुणेकर गप्प बसत नाही, हे लक्षात आल्यावर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि दोन पोलिसांना निलंबित केलं. त्यानंतर हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याला दिला आणि हा प्रकार चव्हाट्यावर आला. आम्ही आधीपासून सांगत होतो, यामध्यै गौडबंगाल झालं आहे, या प्रकरणात चुकीची लोकं तपास करत आहेत. म्हणून ती सुई डॉ. अजय तावरे यांच्याकडे वळली, अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धंगेकर म्हणाले, रक्त फेकून देण्यापर्यंत त्यांनी चुकीचा कारभार केला. आरोपीचं रक्त घेण्याऐवजी त्यांनी दुसऱ्याचं रक्त घेतलं. इतका गंभीर स्वरुपाचा गुन्हा त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पण अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा दबाव येऊ शकतो आणि हा तपास वेगळ्या दिशेला जाऊ शकतो. मी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून आलो, त्याचदिवसापासून सातत्याने विधानसभा, विधानभवनासह अधिवेशनात माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. इतकं बोलून सुद्धा कुणीही त्याकडे लक्ष देत नव्हतं. संविधानाच्या माध्यमातून मी रस्त्यावर आलो. समाजाला आणि पुणेकरांना रस्त्यावर घेऊन उतरलो.
आमची हीच मागणी होती की, मुलं चांगली राहिली पाहिजेत. कारण हीच मुलं आता उमळती फुलं आहेत. पण पब संस्कृती आणि अंमली पदार्थ या मुलांना कोमजवायचं काम करत आहेत. अनेक लोक मला फोन करून सांगतात की, पुण्यात आमची मुलं शिकत आहेत. पण आम्हाला भीतीही वाटते. पण तुम्ही रस्त्यावर आल्यावर वाटतंय, कुणीतरी आमच्या मुलांची बाजू घेतोय, असंही धंगेकर म्हणाले.