Pune : कोथरूड, बाणेर आणि बावधन परिसरातील रस्ते अर्धवट अवस्थेत

Pune : कोथरूड, बाणेर आणि बावधन परिसरातील रस्ते अर्धवट अवस्थेत

कोथरूड, बाणेर व बावधन परिसरातील अनेक रस्ते अद्याप अपूर्ण आहेत याचे कारण आवश्यक भूसंपादन पूर्ण झालेले नाही.
Published by :
Prachi Nate
Published on

कोथरूड, बाणेर व बावधन परिसरातील अनेक रस्ते अद्याप अपूर्ण आहेत याचे कारण आवश्यक भूसंपादन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या वळणाने प्रवास करावा लागत आहे तसेच काही ठिकाणी रस्ते निमूळते झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यातून ट्राफिक ची समस्या उद्भवत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. ही माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत देण्यात आली.

कोथरूडचे आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., एम. जे. प्रदीप चंद्रन तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोथरूडमधील अपूर्ण रस्त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सविस्तर माहिती दिली.

पाषाण परिसर : पीएमपीएल डेपो ते बाह्यवळण रस्त्याचा सेवा रस्ता व ननावरे बायपास परिसरातील काही भूखंडांचे ताबे मिळाले असून लवकरच काम सुरू होणार आहे.

बाणेर व कस्पटे वस्ती परिसर : पुलाच्या पोहोच रस्त्यांसह बाणेर-पाषाण लिंक (३६ मीटर रस्ता) व पाषाण सर्कलजवळील ३० मीटर रस्त्यासाठीही सक्तीचे भूसंपादन करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ते गांधीभवन रस्ता : येथे दीड गुंठ्याच्या भूखंडाचे भूसंपादन रखडले आहे. मालक व दिव्यांग भाडेकरूसोबत चर्चेअंतीही तोडगा न निघाल्याने आता सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कर्वे पुतळा परिसर : येथील पेट्रोल पंपाजवळ २० मीटर रुंदीचा डीपी रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास मयूर कॉलनीशी थेट जोडणी होईल.

पौड फाटा परिसर : सावरकर उड्डाणपूल ते मयूर कॉलनी या दरम्यान डीपी रस्त्यावर भीमनगर भागात स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. त्यावर अंतिम नोटीस बजावून तो मार्ग मोकळा केला जाणार आहे.

वारजे परिसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तिरुपतीनगर मार्गे ते खिंडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेत मालकांनी निवासी दराने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याबाबत प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे.

सक्तीने भूसंपादन केल्याने रस्त्यांची कामे पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होतील. यामुळे वाहतुकीची समस्या सुद्धा सुटेल पण काही भूधारकांना मात्र नुकसान भरपाईसह जागा सोडावी लागेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com