Rohit Pawar On Ajit Pawar
Rohit Pawar On Ajit Pawar

"अजितदादा म्हणतात तुम्ही अजून बच्चे आहात, पण..."; शेतकरी मेळाव्यात रोहित पवारांनी विरोधकांवर डागली तोफ

आमदार रोहित पवारांनी दौंड येथील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधकांवर हल्लाबोल केला.
Published by :

दिल्लीला तुम्ही पद मागण्यासाठी लोटांगण घालता, पण शेतकऱ्यांसाठी तुम्हाला लोटांगण घालता येत नाही. कुटुंब फोडायला, पक्ष फोडायला तुम्हाला अटी लागत नाहीत. पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला अटी लागतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडत होतो. देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत. अजितदादांना हा मुद्दा सांगितला, तर ते म्हणतात, तुम्ही अजून बच्चे आहात. शेतकऱ्यांसाठी आम्ही हे मुद्दे मांडले, तर आम्ही लहान झालो का? शेतकऱ्यांचे मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटत नाहीत का? या सरकारने आपल्याला काय दिलंय? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते दौंड येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

जनतेशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, विरोधकांचं काही करायचं असेल, तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातूनच करावं लागेल. ती वेळ आता या लोकसभेत आली आहे. आम्ही विकासासाठी गेलो, असं हे नेते म्हणतात. पण ते हे सांगत नाहीत, की कोणाच्या विकासासाठी आम्ही गेलो. आज आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे. त्यांना सरकारकडून जी काही मदत वेळेवर मिळायला पाहिजे होती, ती मदत मिळाली नाही. पूर्वीच्या काळात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालत होतं, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं. त्यावेळी कांद्याचे भाव वाढत होते.

कांद्याच्या भावावर शेतकऱ्याचं कुटुंब टिकतं आणि शेतकऱ्यासाठी मी कोणताही निर्णय बदलणार नाही. कांदा शंभर रुपयाला गेला तरी चालेल, अशी भूमिका शरद पवार यांनी त्यावेळी घेतली होती. आज काय परिस्थिती आहे, कांदा आपण शेतात लावला होता. या कांद्याला ३०-४० रुपये किंमत मिळेल, शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिलं होतं. पण केंद्राने काय निर्णय घेतला, कांदा निर्यात बंद...या गोष्टींचा नेत्यांना, सरकारला फरक पडला का? शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्न त्यांना पडला का? असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com