Rohit Pawar : भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला?
महाड येथे मनुस्मृतीचं दहन करत आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावरच आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, ज्यांच्या नसानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तत्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केलं. पण पोर्शे कार अपघातात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन केलं जातंय.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का? असे रोहित पवार म्हणाले.