भगतसिंह कोश्यारी हे मोदी यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य; सामनातून हल्लाबोल

भगतसिंह कोश्यारी हे मोदी यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य; सामनातून हल्लाबोल

केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्यात बदल केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्यात बदल केले आहेत. परंतु, यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. त्यांचा राजीनामा मंजूर झाला. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी पदमुक्त झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर मूठ आपटून बोलत होते. वेगळ्या भाषेत त्याला छाती पिटणे असं म्हणतात, अशी खोचक टीका करतानाच छाती पिटून बोलणे हे पंतप्रधानपदास शोभत नाही. खुर्च्यांवर विराजमान असताना अदृश्य पद्धतीने काही तरी हातमिळवणी केल्याशिवाय अशा नेमणुका सहसा होत नाहीत. कारण केंद्रातील भाजपचे सरकार हे काही कर्णाचे किंवा धर्माचे राज्य नाही. सत्यवचनी हरिश्चंद्राचे तर नाहीच नाही. असा हल्लाबोल करण्यात आला आहे.

कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. तेही मनाने आणि रक्ताने स्वंयसेवकच आहेत. यावर नंतर बोलूच. नवे राज्यपाल बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला. कारण चंदन उगाळण्याचे दिवस संपवले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या गोल्डन गँगच्या सदस्यांना लाभाची पदे आणि अमिषे देऊन लढाईत उतरवले. ही काही मर्दुमकी नाही. राज्य घटनेची आणि तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती. केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे पाळून ठेवले आहेत, असं सांगतानाच महाराष्ट्रात शिवसेनेशी लढण्यासाठी मोदी एकटे नव्हते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या गोल्डन गँगचे सदस्य होते. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com