भाजपावाल्यांच्या निषेधाच्या नागोबांना राहुल गांधी वारंवार संधी का देतात? सावरकर यांच्यावरील विधानावर सामनातून भाष्य
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असे सामनाने म्हटले आहे. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती. असे सामनातून म्हटले गेले आहे.
यासोबतच राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात , पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात?, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो , आदर करतो . त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो , करत राहील! असे सामनातून सांगण्यात आले आहे.