Saamana Agralekh : मोदींच्या ‘दीपस्तंभ’ विधानावर सामनाची कडवी टीका...
थोडक्यात
- सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि पर्यावरण धोरणांवर मोठे प्रश्न 
- ‘जगाला दिशा दाखवणारा भारत’ हा दावा हास्यास्पद 
- ‘सामना’ दैनिकाने या दाव्यावर कडवे शब्दात टीका केली 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक तणाव आणि अस्थिरतेच्या काळात भारत हा दीपस्तंभाप्रमाणे जगाला दिशा दाखवत आहे’ असे विधान केले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) समर्थित ‘सामना’ दैनिकाने या दाव्यावर कडवे शब्दात टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि पर्यावरण धोरणांवर मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
अग्रलेखानुसार, भारतात बेरोजगारी वाढ, रुपयाची घसरण, वाढती विषमता आणि पर्यावरणीय नुकसानीकडे दुर्लक्ष करून केलेले ‘दीपस्तंभ’ विधान हे वास्तवापासून दूर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशातील 80 कोटी लोक मोफत धान्यावर अवलंबून आहेत, काही उद्योगसमूहांची संपत्ती वाढत असताना सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत, अशा परिस्थितीत ‘जगाला दिशा दाखवणारा भारत’ हा दावा हास्यास्पद असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत झालेल्या ‘इंडिया मेरीटाइम समिट’मध्ये भारताच्या प्रगतीचा गौरव केला होता. मात्र, सामनाच्या मते, परराष्ट्र धोरण, व्यापार संबंध, तसेच पर्यावरणीय निर्णयांमुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. कोकणातील वाढवण बंदर प्रकल्पाचा उदाहरणादाखल उल्लेख करून, पोलिसी बळ आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यावरही टीका करण्यात आली आहे.

