मविआला मोठा झटका, 'हा' पक्ष बाहेर, अबू आझमींची मोठी घोषणा
थोडक्यात
अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतील सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नसल्याचं कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला.
ते विधानसभेत एक वेगळा गट निर्माण करण्याची योजना आखत आहेत.
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा नर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नसल्याचे कारण देत अबू आझमी यांनी हा निर्णय घेतलाय. त्याशिवाय ते विधानसभेत वेगळा गट निर्माण करणार आहेत.
विरोधी पक्षाच्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, असे अबू आझमी यांनी शनिवारी सांगितले. तिकीट वाटपाच्या वेळी आमच्याशी संवाद झाला नाही. निवडणुकीच्या वेळी समन्वय नव्हता… मग त्यांच्याशी आमचा काय संबंध? असा थेट आरोप अबू आझमी यांनी मविआ वर केला आहे.
अबु आझमी काय म्हणाले?
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. तसेच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर आझमी यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.
तसेच शिवसेना (यूबीटी) 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी (एसपी) 10, समाजवादी पक्ष दोनवर विजयी झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधकांमध्ये तडा गेला असतानाच, शिवसेना (यूबीटी) म्हणाली की, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास वाढला आहे. एमव्हीएच्या आमदारांनी आज ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शपथ घेतली नाही यावर, महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी म्हणाले की आम्हाला याच्याशी काय करायचे आहे – तिकीट वाटपाच्या वेळी आमच्याशी संपर्क साधला गेला नाही, निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. पण, जर लोकांना शंका असेल तर मी ईव्हीएम काढून टाकण्याचा सल्ला देतो. मी शपथ घेतली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मविआने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.