शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपाने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे; सामनातून हल्लाबोल
आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
तसेच सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढ्यातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र आहे. 1960 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले म्हणजे काय झाले? ते आकाशातून पडले की या देशाच्या भूमीतून एकदम वर आले? असा प्रश्न पडला असेल. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच मुंबईवरील शिवसेनेची पकड तोडायची. मग मराठी माणूस आपोआप नष्ट होईल व लगेच मुंबईचा घास गिळायचा हे एकंदरीत षड्यंत्र आहे. गृहमंत्री अमित शहा जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊल ठेवतात, त्या प्रत्येक वेळी मुंबईकरांच्या काळजात ‘चर्र’ होते. ते मुंबई तोडण्यासाठीच आले आहेत किंवा येत आहेत या भयाने तो व्याकूळ होतो, पण त्यातूनच त्याच्यातला मर्द मावळा उसळतो. “मुंबईची रक्षणकर्ती म्हणून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसून भाजपने मुंबई तोडण्याचे पाऊल पुढे टाकले आहे. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी लढावे लागेल. 105 हुतात्मे झाले. उद्या त्यात भर पडली तरी चालेल, पण शिवरायांचा महाराष्ट्र मुंबईसह एक राहावा, यासाठी नवी लढाई लढावीच लागेल. असे सामनातून म्हटले आहे.