वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे भाजपाला शापच देत असतील; सामनातून हल्लाबोल
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात काही जणांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 13 मे रोजी ही घटना घडली असून मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांनी वाद घालणाऱ्या जमावाला रोखले. त्यांनतर पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र त्यांनतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग देवस्थानने पत्र दिल्याची माहिती मिळते आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, दुत्वाच्या नावावर सुरू असलेली ही काळाबाजारी दुकाने बंद केली जात नाहीत तोपर्यंत हिंदुत्वाचे हसेच होईल. गृहमंत्र्यांनी उतावीळपणे करावा हे अधिक गंभीर आहे. चौकशी करायचीच असेल तर गोमूत्राचे बॅरल घेऊन त्र्यंबकेश्वरात हैदोस घालणाऱ्या हिंदुत्वाच्या उपठेकेदारांची करा. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या पोरकट संघटनांना मंदिराचे शुद्धीकरण करण्याचे कंत्राट कोणी दिले? देशात हिंदुत्वाच्या नावाने जो कर्कश गदारोळ घातला आहे तो पाहता दोन्ही हिंदुहृदयसम्राट वीर तात्याराव सावरकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपला शापच देत असतील. भाजपचे हिंदुत्व हे ‘गोमूत्रधारी’च आहे. त्यांच्या हिंदुत्वास ना आगा ना पिछा. विचारांचा शेंडा-बुडखा तर अजिबात नाही हे त्र्यंबकेश्वरमध्ये घडवून आणलेल्या घटनांवरून सिद्ध झाले. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.