बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी आणि शाह यांच्या टाळक्यात हाणली; सामनातून हल्लाबोल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. याच निवडणुकीवर आता सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, कर्नाटकातील जनतेने मोदींच्या रडण्याला, हिंदुत्वाला आणि धार्मिक मुद्द्यांना अजिबात जुमानले नाही. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला तर दंगली होतील, या अमित शाह यांच्या धमकीलाही कानडी जनतेने जुमानले नाही.कर्नाटकातील मोदी आणि शाह यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता. भाजपने चालवलेले ऑपरेशन लोटसही कानडी जनतेने चिरडून टाकले आहे. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अवघ्या 65 जागांवर आणून सोडले. ऑपरेशन लोटस घडवून, धमक्या देऊन, धर्मांध प्रचार करून, विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावून निडणुका जिंकण्याचे दिवस गेले आहेत. कर्नाटकात खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटस झालं आहे.
मोदी आणि शाहा यांचा कानडी जनतेने पराभव केला हा देशासाठी मोठा शुभ शकून आहे.बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी आणि शाह यांच्या टाळक्यात हाणली. हीच विजयी गदा त्यांनी राहुल गांधी यांच्या खांद्यावर स्पष्ट ठेवली आहे. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.