भारतीय जनता पक्षाच्या पोपटरावांनी विरोधकांवर वाट्टेल त्या भाषेत चिखल उडवायचा; सामनातून मोदी सरकारवर टीका
2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने काल (23 मार्चला) आपला निकाल दिला. 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकात एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले होते, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्यात एक गोष्ट समान आहे. सर्वच चोरांची आडनावे मोदीच कशी ? असे राहुल गांधी म्हणाले होते.
न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. 2 वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वही धोक्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, राजकारणात टीका करण्याचे स्वातंत्र्य फक्त मोदींच्या अंधभक्तांनाच आहे. इतरांनी टीका केली तर ती मोदींची मानहानी होते व त्यांना तुरुंगात पाठवले जाते,भारतीय जनता पक्षाच्या पोपटरावांनी विरोधकांवर वाट्टेल त्या भाषेत चिखल उडवायचा, आरोप करायचे, त्यांच्यावर कारवाईचे नाव नाही; पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळेल तेथे अडकवायचे असे एकंदरीत मोदी सरकारचे धोरण दिसते.
तसेच नीरव मोदी, ललित मोदी व नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी’ नावावरून एका भाषणात केलेल्या टिप्पणीवरू राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले व शिक्षा ठोठावली. असे सामनातून म्हटले आहे.